महापालिकांसाठी होणार नव्याने प्रभाग रचना   

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लवकरच निवडणुका

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेत एकचा आणि पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापुरसह उर्वरीत राज्यातील महापालिकांमध्ये चारचा प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाकडुन देण्यात आले आहेत.या आदेशानुसार,  कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या अ, ब, क वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील ड वर्गातील १९ महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. 
 
मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आधी कोरोना आणि नंतर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्याने या निवडणुका खोळंबल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.
 
या आदेशांचे पालन करताना नगरविकास विभागाने या अ, ब , क वर्ग १० महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तर ड वर्ग १९ महापालकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे.महायुतीत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ८ सप्टेंबर २०२२ च्या अधिनयमानुसार अ, ब, क व ड वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीत तीन किंवा पाच सदस्य प्रभाग रचना असेल.  
 
आयोगाने मान्यता दिल्यानंतर  प्रभाग रचना महापालिका आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. यावर सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल. ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करेपर्यंत ही प्रभाग रचना गुप्त ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
 

Related Articles